मुंबई : एमएमआर क्षेत्रातील वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विविध मेट्रो व पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स मोठ्या प्रमाणात हटविले आहेत. तर काही ठिकाणचे बॅरिकेट हटविण्याचे काम सुरू आहेत. यामुळे पावसाळ्यापूर्वी मेट्रो मार्गिकेखालील रस्ते नागरिकांसाठी खुले होणार आहेत.
एमएमआरडीएमार्फत ‘एमएमआर’ क्षेत्रात विविध मेट्रो, उड्डाणपुलाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कामांसाठी रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यामुळे प्रवाशांना ठिकठिकाणी वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत होते. तसेच वाहन चालकांना मनस्ताप होत होता. मेट्रो उड्डाणपुलांची कामे पूर्णत्वाकडे जाऊ लागल्याने एमएमआरडीएने मेट्रो मार्गांवरील बॅरिकेड्स हटवले आहेत.
यामुळे वाहतूककोंडी कमी होणे, रस्त्यांची उपलब्धता वाढणे, पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होणे तसेच मान्सून काळात प्रवाशांना अधिक सुलभ व सुरक्षित प्रवास अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत.
एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, भाप्रसे आणि अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनुसार विविध प्रमुख मेट्रो मार्गांवर बॅरिकेड्स हटविण्याचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.
बॅरिकेड्स हटवलेले प्रकल्पांचे अंतर आणि टक्केवारी
मेट्रो मार्ग २ बी (डी. एन. नगर - मंडाळे) : १८,२७७ मीटर (८८.६४%)
मेट्रो मार्ग ४ व ४ ए (वडाळा - कासारवडवली - गायमुख) : ३१,७०६ मीटर (९२%)
मेट्रो मार्ग ५ (ठाणे - भिवंडी) : ११,१३४ मीटर (९८.८८%)
मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर - विक्रोळी) : २८,९५२ मीटर (९६%)
मेट्रो मार्ग ९ (दहिसर पूर्व - मीरा भाईंदर) : १७,२७५ मीटर (९४%)
मेट्रो मार्ग १२ (कल्याण - तळोजा) : ७,१७४ मीटर