मुंबई : उन्हाच्या काहिलीने भाजून निघालेल्या मुंबईकरांवर रविवारी पावसाने थोडा काळ कृपादृष्टी केली. मुंबई व उपनगरात रविवारी सकाळी काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत अचानक गारवा निर्माण झाला असून मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला. पण नंतर दिवसभरात उकाड्याने मुंबईकरांना हैराण केले.
गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून आता २३ जूनपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल होत आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने सोमवारपासून मुंबई आणि ठाणे परिसरासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे सध्याच्या दमट वातावरणातून नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
२५ जूनपर्यंत मान्सूनचा जोर महाराष्ट्रात फारसा वाढणार नसला, तरी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. २५ जून ते २ जुलै या कालावधीत मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होईल आणि उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढेल.