ANI
मुंबई

Mumbai : मतदान वेगाने होण्यासाठी सुसूत्रीकरण; एका केंद्रावर आता सरासरी १२०० मतदार, मुंबईत आणखी २१८ केंद्रांची भर

Swapnil S

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील अनेक भागांत संथ गतीने मतदान झाल्याच्या, मतदारांना ताटकळत राहावे लागल्याच्या तक्रारीनंतर आता मुंबई शहर आणि उपनगरातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राची आधीची सरासरी १५०० इतकी मतदार संख्या आता सरासरी १२०० पर्यंत आली आहे.

नवीन बदलांसंदर्भात मतदारांना माहिती देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ म्हणजेच ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मतदार नोंदणी अधिकारी मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रांच्या ठिकाणामध्ये झालेल्या बदलांची माहिती देतील. याशिवाय, नोंदणीकृत मतदारांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रसारमाध्यमांतूनही माहिती देण्यात येईल.

केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने तयारी सुरू आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण हा त्याचाच एक भाग आहे.

हे सुसूत्रीकरण करताना प्रामुख्याने एका मतदान केंद्रावर सरासरी १२०० पर्यंत मतदारसंख्या राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. अधिक उपकेंद्रे (बुथ) असलेल्या एकाच ठिकाणावरील मतदान केंद्रांचे विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काही भागांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे.

ही माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यासाठी महानगरपालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका आयुक्त गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत सविस्तर माहिती दिली. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यावेळी उपस्थित होते.

मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या आता १० हजार १११

मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या सरासरी १२०० पर्यंत घटविण्यात आल्याने मुंबईतील केंद्रांची संख्या आता १० हजार १११ इतकी झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत २१८ इतकी वाढ झाली आहे. या उपाययोजनेमुळे मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढण्यास मदत होईल, असा आशावाद निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीतील मतदान केंद्रे

-मुंबई शहर- २,५०९.

-मुंबई उपनगर - ७,३८४.

सुसूत्रीकरणानंतरची संख्या

-मुंबई शहर - २,५३७.

-मुंबई उपनगर - ७,५७४.

-संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्र - १०,१११.

Mumbai : कोस्टल रोड आता सातही दिवस खुला; पण 'या' वेळेतच करता येणार प्रवास!

केंद्र सरकारला मोठा झटका! सुधारित आयटी नियम अखेर रद्द; घटनाबाह्य असल्याचा हायकोर्टाचा निर्णय

Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवरही १० तासांचा ब्लॉक

सणांपूर्वीच महागाईने सर्वसामान्यांचा खिसा कापला! खाद्य तेल १२ टक्क्याने महाग

‘मविआ’ची ८० टक्के जागांवर सकारात्मक चर्चा; 'या' जागांचा तिढा कायम!