मुंबई : विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध कौशल्ये देत त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि भारतीय उद्योग परिसंघ यांच्यात 'एज्युकेशन -एम्प्लॉयमेंट (ई२ई) करिअर लाऊंज' स्थापन करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या संधींशी जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
विद्याथ्यांकडे उद्योगाला अपेक्षित कौशल्यांची उणीव तसेच शैक्षणिक ज्ञान आणि उद्योगाच्या अपेक्षा या पार्श्वभूमीवर सीआयआयकडून मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरात उभारण्यात येणारे हे लाऊंज भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) उपक्रमाशी सुसंगत असा हा प्रकल्प असेल. येथे करिअर समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण, नोकरी सहाय्य आणि प्लेसमेंट सहाय्य अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या या कराराच्या स्वाक्षरी समारंभाला कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, सीआय आयचे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी, सीआयआयचे प्रतिनिधी पृथाजित लाहिरी, दयाल कांगणे यांच्यासह गरवारे करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक आणि सीटीपीसीचे संचालक प्रा. सचिन लबडे उपस्थित होते.
शिक्षण आणि उद्योगाचे एकत्रीकरण
मुंबई विद्यापीठ आणि सीआयआय यांच्या सहकार्याने सुरू होत असलेला 'शिक्षण ते रोजगार करीअर लाऊंज' हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण आणि उद्योग यांचे प्रभावी एकत्रीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे करीअरविषयक स्पष्ट दिशा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन मिळणार
सीआयआयचे कार्यकारी संचालक सौगत रॉय चौधरी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञान, विविध उद्योग क्षेत्रे आणि करिअर संधींबाबत अद्ययावत माहिती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच उद्योग तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करीअरच्या संधी
मुंबई विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणारे 'ई२ई करिअर लाऊंज' विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी करिअर केंद्र ठरणार आहे. उद्योगाशी थेट संवाद, कौशल्य प्रशिक्षण आणि प्लेसमेंट मार्गदर्शन यामुळे विद्याथ्यर्थ्यांना शैक्षणिक प्रवासातून व्यावसायिक क्षेत्रात सहज संक्रमण साधता येईल. हा उपक्रम शिक्षण व उद्योग यांच्यातील मजबूत दुवा निर्माण करून विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करीअरच्या संधी निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या उपक्रमाचे समन्वयन मुंबई विद्यापीठाच्या करीअर प्रशिक्षण व प्लेसमेंट कक्षामार्फत करण्यात येणार आहे.