मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा गुरुवारी अचानक रद्द झाला आहे. तांत्रिक कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंडे या दुपारी मुंबईहून साताऱ्याला जाणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने दौराही रद्द करावा लागला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे रस्ते मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने नेत्यांच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याआधी मुंडेंचा लातूर दौराही झाला होता रद्द
याआधी मंगळवारी देखील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पंकजा मुंडेंचा लातूर दौरा रद्द झाला होता. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि संभाव्य सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे कळविले अजित पवार यांच्या अपघातानंतर नेत्यांच्या हवाई सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केल्या जात आहे. मात्र अशाच घटना सतत घडत असल्यामुळे हवाई यंत्रणांच्या कार्यभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मी सकाळी साडेदहा वाजता निघणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेकऑफ होणार होते. मात्र मला कळवण्यात आले की, मी जे हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते, हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड झाला आहे या टेक्निकल बाबीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे सांगण्यात आले. मात्र जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल.पंकजा मुंडे