मुंबई : वडाळा येथील गृहनिर्माण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून गुरुवार ३० एप्रिलला सभागृहात मंजुरीसाठी सादर करण्यात आला. मात्र यावेळी भाजपचे नगरसेवक गैरहजर असल्याने प्रस्ताव नामंजूर करण्याची वेळ महापौर रितू तावडे यांच्यावर आली. पक्षाने व्हिप काढला तर सभागृहात नगरसेवकांना हजर राहणे अनिवार्य आहे. मात्र, त्यावेळी सभागृहात वेळेत का उपस्थित राहिला नाही, उशीर का झाला, किती वाजता सभागृहात पोहोचला याबाबत लेखी नोटीस बजावण्यात आल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिका सभागृहात आधीच निधी वाटपावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच गुरुवार ३० एप्रिलला महापालिका सभागृहात सुधार समितीत मंजूर झालेल्या वडाळा येथील गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात तातडीचे कामकाज म्हणून सादर करण्यात आला. परंतु सभागृहात संख्याबळापुढे विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ केवळ दोननेच अधिक असल्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्याची वेळ महापौर रितू तावडे यांच्यावर आली.
या प्रकारानंतर भाजपच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सभागृहात हजर राहण्याबाबत पक्षाने व्हिप काढला तर सभागृहात वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे.
पक्षाने आदेश दिले होते सभागृहात वेळेत उपस्थित राहा पण काही नगरसेवक नाही पोहोचले. त्यामुळे उशिरा का झाला, किती वाजता सभागृहात पोहोचलात, अशी विचारणा करणारी लेखी नोटीस बजावण्यात आल्याचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी सांगितले. यामुळे नगरसेवकांना शिस्त लागेल, असे म्हटले जात आहे.
हा संघटनेचा विषय - महापौर
सभागृहात नगरसेवक गैरहजर, कोणाला नोटीस बजावली हा संघटनेचा विषय आहे. मी आणि माझे सभागृह तेवढाच माझा विषय, अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिली.
भाजपला कुठे विश्वासात घेतले
सभागृहात बोलू दिले जात नाही, विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप विरोधकांनी भाजप महायुतीवर केला आहे. यावर सडेतोड उत्तर देत विरोधक सत्तेत होते तेव्हा भाजपला कुठे विश्वासात घेतले, असा टोला महापौर रितू तावडे यांनी विरोधकांना लगावला. विरोधी बाकावर बसले या मानसिकतून ते अजून बाहेर पडलेले नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या गाइडलाइननुसार काम करू, तुम्ही तुमच्या पक्षाच्या गाइडलाइननुसार काम करा, पण भविष्यात असे चित्र दिसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.