नवी दिल्ली : आपल्या विचारांवर भाजप कायम राहिला असून देशाच्या विकासाला आम्ही दिशा दिली आहे. सत्तेवर येण्यासाठी पक्षाच्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. ३७० कलम हटवणे, राम मंदिर उभारणी व तीन तलाक आदी आश्वासने आम्ही दिली होती. ती आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. भाजप जे बोलतो ते करून दाखवतो, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.
भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजप सरकार वक्फच्या पैशाचा योग्य वापर करेल. हा पैसा मुस्लिमांचे शिक्षण, आरोग्य व रोजगारासाठी खर्च होईल. वक्फ बोर्डाच्या नियमांचे पालन करून तो चालवला जाईल. कारण अनेक देशांत वक्फ बोर्ड हे सरकार चालवत आहे, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे १३.५ कोटींपेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यातील १० लाख कार्यकर्ते सक्रिय असून ६ लाख बूथ अध्यक्ष आहेत. पक्षाचे नेते ७ ते १३ एप्रिलदरम्यान ५ लाख बूथ व १ लाख वस्त्यांपर्यंत जाणार आहेत, असे ते म्हणाले. भाजपचा उद्देश कायम देशाची प्रगती व लोकशाही मजबूत करणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.