राष्ट्रीय

हरिद्वारमध्ये भूस्खलन, रेल्वेमार्ग बंद; पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त हिमाचल, पंजाब दौऱ्यावर

हरिद्वार येथील ‘हर की पौडी’जवळ मंशा देवी टेकड्यांवर भूस्खलन झाले. त्यामुळे हरिद्वार-देहरादून रेल्वेमार्ग बंद झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मंशा देवी टेकडीवरून पडलेले दगड भिंगोडा येथे काली मंदिराजवळ रेल्वे रुळांवर कोसळले आणि हरिद्वार-देहरादून-ऋषिकेश रेल्वेमार्ग बंद झाला, अशी माहिती जीआरपीच्या अधीक्षक अरुणा भारती यांनी दिली.

Swapnil S

हरिद्वार: हरिद्वार येथील ‘हर की पौडी’जवळ मंशा देवी टेकड्यांवर भूस्खलन झाले. त्यामुळे हरिद्वार-देहरादून रेल्वेमार्ग बंद झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

मंशा देवी टेकडीवरून पडलेले दगड भिंगोडा येथे काली मंदिराजवळ रेल्वे रुळांवर कोसळले आणि हरिद्वार-देहरादून-ऋषिकेश रेल्वेमार्ग बंद झाला, अशी माहिती जीआरपीच्या अधीक्षक अरुणा भारती यांनी दिली.

भिंगोडा रेल्वे बोगद्याजवळील रेल्वेमार्ग पूर्णपणे बंद झाल्याने वंदे भारत एक्स्प्रेससह डझनभरहून अधिक गाड्यांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे, असे त्या म्हणाल्या.

रेल्वेमार्गाशेजारी बांधलेले शिवमंदिरही भूस्खलनाच्या धक्क्यामुळे कोसळले, अशी माहिती परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल सुयाल यांनी दिली.

हरिद्वारमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा मंशा देवी टेकड्या तडकू लागल्या आहेत. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीही भूस्खलन होऊन रेल्वेमार्ग अडवला गेला होता.

टेकडी आणि रेल्वेमार्गाच्या दरम्यान मोठे लोखंडी जाळे बसवण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही मोठे दगड जाळे फोडून रुळांवर कोसळले.

रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले असून रुळांवरील मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे.

वंदे भारत एक्स्प्रेससह या मार्गावरील रेल्वेगाड्यांची हालचाल सध्या स्थगित करण्यात आली आहे. रुळांवरील अवशेष हटवण्यास ८-१० तास लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

दगड अडकलेले लोखंडी जाळे गॅस कटरच्या साहाय्याने कापले जात आहे, तर जेसीबीच्या साहाय्याने रुळांवरील दगड हटवले जात आहेत.

पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त हिमाचल, पंजाब दौऱ्यावर

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत. ते हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलनग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण करतील. मोदी हे कांगडा येथे जाऊन अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतील.

पंतप्रधान पूरग्रस्त नागरिकांशी तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि ‘आपदा मित्र’ पथकांशी कांगडा येथे संवाद साधणार आहेत.

मोदी हे पंजाबमधील पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण करतील. ते गुरदासपूरला जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तेथेही ते पूरग्रस्त लोकांशी तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपदा मित्र पथकांशी संवाद साधतील.

पंतप्रधानांचा थेट आढावा दोन्ही राज्यांतील नागरिकांना मदत व पुनर्वसनाच्या प्रयत्नांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी असून, कठीण काळात त्यांना आधार मिळावा हा उद्देश आहे.

पुण्यापाठोपाठ ठाण्यातही महायुती तुटली! अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

मुंढवा जमीन : ३०० कोटी रुपयांच्या व्यवहाराबाबत तेजवानीचे 'मौन'च

"आम्ही जर युती म्हणून सोबत निवडणूक लढवली तर..."; पुण्यात अजित पवारांच्या NCP सोबत का नाही लढणार? फडणवीसांनी केलं स्पष्ट

PMC Elections 2025 : पुण्यात महाविकास आघाडीचं ठरलं! एकत्र निवडणूक लढणार; मनसेबाबतचा निर्णय...

BMC Election : मुंबईत महायुती एकत्र लढण्यास सज्ज; मविआत मनसेवरूनच मतभेद