राष्ट्रीय

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

भारत सरकारने त्यांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय घेतला असून ओव्हरस्टेवरील म्हणजेच ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यास आकारला जाणारा दंडही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारत सरकारने त्यांच्या व्हिसा मुदतवाढीचा निर्णय घेतला असून ओव्हरस्टेवरील म्हणजेच ठरलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहिल्यास आकारला जाणारा दंडही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लवकरच संपणारे किंवा आधीच संपलेले सर्व व्हिसा आणि ई-व्हिसा एका महिन्यासाठी विनामूल्य वाढवले जाणार आहेत. ही मुदतवाढ संबंधित फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) मार्फत दिली जाणार आहे.

ओव्हरस्टे दंड माफ

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, २८ फेब्रुवारीनंतर मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांवर ओव्हरस्टेसाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.

तसेच, प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी लागणारे एक्झिट परमिट देखील विनामूल्य दिले जाणार आहे. त्यामुळे उड्डाण सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नागरिकांना भारत सोडणे सोपे होईल.

अधिकाऱ्यांनी असेही स्पष्ट केले की, जर एखाद्या परदेशी नागरिकाला व्हिसा मुदतवाढ किंवा एक्झिट परमिटसाठी अर्ज करता आला नाही, तरीही त्याला स्थलांतर नियमांचे उल्लंघन मानले जाणार नाही.

डायव्हर्ट झालेल्या उड्डाणांसाठी विशेष सुविधा

संघर्षामुळे काही उड्डाणे भारताकडे वळवली गेल्यास अशा प्रवाशांना तात्पुरती उतरण्याची परवानगी (Temporary Landing Permit - TLP) विनामूल्य दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे प्रवासावर परिणाम

सध्या मध्यपूर्वेत तणाव वाढला असून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर तसेच इस्रायलवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. या वाढत्या तणावाचा परिणाम विमान वाहतुकीवरही होत आहे.

कतारमधून भारतीय प्रवाशांची सुटका

दोहा येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजच्या उड्डाणांद्वारे जवळपास ५०० भारतीय नागरिकांना कतारमधून भारतात आणि इतर देशांमध्ये प्रवास करता आला. यातील काही प्रवासी कोचीसह इतर गंतव्यस्थानी पोहोचले.

तसेच, नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झालेल्या दोन भारतीय नागरिकांचे पार्थिव आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोची येथे आणण्याची व्यवस्था करण्यात आली.

कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले

दूतावासाने सांगितले की, कतारचे हवाई क्षेत्र सध्या अंशतः खुले आहे. त्यामुळे उड्डाणे मर्यादित प्रमाणात सुरू आहेत. १४ मार्च रोजी कतार एअरवेजचे मुंबईकडे एक उड्डाण नियोजित असल्याची माहिती देण्यात आली.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही परिणाम

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या जलमार्गावर तणाव वाढल्याने चिंता वाढली आहे.

या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेलाची वाहतूक होते. त्यामुळे या संघर्षाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन