मुझफ्फराबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेली आहे. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून या भीषण चकमकीत तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या धुमश्चक्रीनंतर पीओकेमध्ये मंगळवारी कडक बंद आणि चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले असून, सुरक्षा दलांना लष्कर तैनात करण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण बंदपूर्वीच रावलकोटमध्ये आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमध्ये प्रचंड रक्तरंजित संघर्ष झाला.
जनतेच्या संतापाचे कारण
पाकिस्तानी सरकारने ४५ जागांच्या स्थानिक विधानसभेत जम्मू-काश्मीरबाहेर पाकिस्तानच्या इतर भागांत राहणाऱ्या निर्वासितांसाठी १२ जागा राखीव ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. निर्णयामुळे स्थानिक प्रतिनिधित्व संपेल, असा जेएएसीचा आरोप असून, हा कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून जनता महागाई आणि भूकमारी, राजकीय असंतोष तसेच बॅन आणि हत्या या मुख्य कारणांमुळे त्रस्त आहेत. या सगळ्यामुळेच पीओके जनतेचा रोष उफाळून आला आहे.