ICC Women's T20 World Cup : टीम इंडियासमोर 'करो या मरो'ची स्थिती; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान X | BCCI
क्रीडा

ICC Women's T20 World Cup : टीम इंडियासमोर 'करो या मरो'ची स्थिती; भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला आता 'करो या मरो'ची स्थितीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. रविवारी होणाऱ्या या निर्णायक लढतीत भारताला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका टाळून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवावे लागेल.

Swapnil S

लंडन : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला आता 'करो या मरो'ची स्थितीत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. रविवारी होणाऱ्या या निर्णायक लढतीत भारताला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका टाळून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवावे लागेल. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा विजय भारतीय संघासाठी अनिवार्य आहे.

स्पर्धेत सध्या दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण आहेत आणि त्यांचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशविरुद्ध विजय अपेक्षित धरल्यास, भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत अपराजित असून त्यांचे आठ गुण आहेत. भारताचे सहा गुण असून नेट रनरेटच्या आधारे ते स्पर्धेत टिकून आहेत. भारतीय संघाची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे चिंतेचे विषय ठरले आहेत. गेल्या दोन सामन्यांत भारतीय क्षेत्ररक्षकांनी सहा झेल सोडले आहेत. विशेषतः राधा यादवने गेल्या दोन सामन्यांत तीन झेल सोडले आहेत.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ आता चुका सुधारण्यावर भर देत आहे. भारताची फिरकीपटू श्री चरणीने आतापर्यंत चार सामन्यांत १२ बळी घेतले आहेत, परंतु तिला इतर गोलंदाजांकडून साथ मिळणे गरजेचे आहे. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजी सातत्याने अपयशी ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या लढतीसाठी सज्ज असून, दुखापतीतून सावरलेली फीबीलिचफिल्ड या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. भारताला जर उपांत्य फेरीत धडक मारायची असेल, तर त्यांना संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागेल.

मधल्या फळीकडून निराशा

स्मृती मानधना (१६७ धावा) आणि शफाली वर्मा (१४५) या भारतीय सलामीवीरांनी आतापर्यंत दमदार सुरुवात करून दिली आहे. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले ते मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे. कर्णधार हरमनप्रीत कौर (८५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (५८) या अव्वल फलंदाज आतापर्यंत अपयशी ठरल्या आहेत.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, नंदिनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.

ऑस्ट्रेलिया : सोफी मॉलिनेक्स (कर्णधार), फोएबे लिचफील्ड, बेथ मूनी, जॉर्जिया वोल, ताहिला मॅकग्रा, अॅशले गार्डनर, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, निकोला कॅरी, मेगान शट, जॉर्जिया वेअरहॅम

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : सात टक्के पाणी शिल्लक; धरणातील पाणीसाठा तळ गाठतोय; पावसाची ओढ कायम

रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : 'जे. जे.'ची स्थिती पाहता पालिकेने सावध होण्याची गरज; पालिका विरोधी पक्षनेत्यांची सूचना

Mumbai : सोमवारपासून मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी लोकल; वातानुकूलित सेवांची संख्या १२० होणार

भाजपमुक्त रामासाठी आता रस्त्यावर आंदोलन - उद्धव ठाकरे