थायलंडमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून २० भारतीयांना म्यानमारमध्ये गुलामासारखं जीवन जगण्यास भाग पाडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या नागरिकांना भारतात परत यायचं असून त्यांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाची (MEA) मदत घेतली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांनी कैरानाचे भाजप खासदार प्रदीप चौधरी यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि परराष्ट्रमंत्र्यांना पत्रही लिहिलं आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, म्यानमारमध्ये अडकलेल्या कामगारांपैकी एका कामगारानं सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत म्यानमारमध्ये त्यांची अवस्था किती वाईट झाली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
एक पुरुष सांगताना या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतोय की, "एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि एका मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुबईच्या एका एजंटनं त्यांना फसवलं आणि म्यानमारमध्ये बंदी बनवलं आहे, जिथं त्यांचं दररोज क्रूरपणे शोषण केलं जात आहे.
व्हिडिओमध्ये काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, २० भारतीयांपैकी एक असलेल्या कुलदीप याने ८३ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, “आमच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे, परंतु आमचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतानाही अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. इथं एक व्यक्ती आधीच मरण पावली आहे आणि त्याच्यासोबत एक मुलगी देखील आहे. तिच्या डोक्याला मारहाणीमुळं दुखापत झाली आहे, पुढचा नंबर आमचा असू शकतो. एकतर ते आम्हाला ठार मारतील किंवा आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील."
कुलदीप पुढे म्हणत आहेत की, “आम्हाला दिवसात १८ तास काम करायला लावलं जातं आणि फक्त दोन वाट्या भात दिला जातो. आम्ही तसं करण्यास नकार दिल्यास आम्हाला मारहाण केली जाते आणि शिक्षा म्हणून आम्हाला १० किलोमीटर पळण्यास भाग पाडलं जातं. आम्ही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला आम्हाला वाचवण्याची विनंती करत आहोत."
कुलदीपचा भाऊ राहुल कुमार याने TOI ला सांगितलं की, “कुलदीपने हे व्हिडिओ गुप्तपणे एका छुप्या फोनद्वारे रेकॉर्ड केले आहेत. ते २२ एप्रिल रोजी सहारनपूरहून निघाले आणि नंतर दिल्लीहून बँकॉकला गेले. तिथून त्यांना सीमेपासून थोड्या अंतरावर असलेल्या माई सॉट विमानतळावर नेण्यात आलं. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना म्यानमारमधील जंगलात नेण्यात आलं आणि तेव्हापासून ते तिथं गुलामासारखं जीवन जगत आहेत.”
राहुल कुमार पुढे म्हणाले, “माझ्या भावाला ज्या वाहनांमध्ये इतर लोकांसह नेण्यात आलं होतं, ती वाहनं सुमारे ५-६ तास सतत फिरत राहिली आणि त्यांना बंदिवासाची जागा विमानतळापासून सुमारे शंभर किलोमीटर दूर आहे, असं भासवण्यात आलं. पण तसं नाही, माई सॉट विमानतळापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेला हा म्यावाड्डी परिसर म्यानमारमध्येच आहे. आता म्यानमारमधील ज्या कंपनीनं त्यांना ओलीस ठेवलं आहे, त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भारतीयांना ७५०० डॉलर्समध्ये खरेदी केलं आहे.