प्रेमाचा अनोखा फतवा; प्रतीक-श्रद्धाची नवी जोडी मोठ्या पडद्यावर

एक अनोखी लव्हस्टोरी घेऊन 'फतवा' ९ डिसेंबरला रुपेरी पडद्यावर येत आहे. त्यानिमित्ताने 'नवशक्ती'शी या चित्रपटाच्या टीमने मनमोकळ्या गप्पा मारल्या
प्रेमाचा अनोखा फतवा; प्रतीक-श्रद्धाची नवी जोडी मोठ्या पडद्यावर
Published on

कोणतीच प्रेमाची गोष्ट ही सारखी नसते, प्रत्येकाच्या प्रेमाची वेगळी गोष्ट असते, असा संदेश घेऊन एका प्रेमवीराची गोष्ट घेऊन 'फतवा' हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे. अशामध्ये या चित्रपटाचे नवोदित अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रतिक गौतम, तसेच नवोदित अभिनेत्री श्रद्धा भगत आणि प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनी 'नवशक्ती'ला भेट दिली. ‘फतवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट नक्की प्रेक्षकांच्या मनाला भावेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने दर्शवला आहे. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. या चित्रपटातून प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे. रवि आणि निया यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘फतवा’ चित्रपटात बघायला मिळणार आहे.  

 अभिनेत्री छाया कदम
अभिनेत्री छाया कदम

या चित्रपटाची कथा प्रतिक गौतम याची असून यामध्ये त्याने लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयदेखील केला आहे. अवघ्या २४ वर्षाच्या या अवलियाने आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक कष्ट केले असून अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. गेल्या ६ वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करत असून ९ डिसेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नाट्यस्पर्धेत लहानपणापासून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता प्रतिक गौतम याने आजवर एकांकिका, शॉर्टफिल्म यांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या काहुर या लघुपटाला २०१६मध्ये दिल्ली फिल्म फेस्टिवल व जयपूर फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ग्रामीण भागातल्या प्रतिकने मेहनतीने आपल्या इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

विशेष म्हणजे, प्रतीकने ग्रामीण भागातून येऊन स्ट्रगल करून, चित्रपट क्षेत्राशी काही संबंध नसलेला, सामान्य कुटुंबात वाढलेला असूनही बिगबजेटवर चित्रपट करतो, हे खरच कौतुकास्पद आहे. अभिनेत्री श्रद्धा भगत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी अभिनयाची कार्यशाळा घेण्यात आली. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर आपली कमाल दाखवायला सज्ज झाली आहे. या नव्या जोडीसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये बाबा चव्हाण आणि अराफत मेहमूद यांनी संगीत केले आहे.

यामध्ये वेगवेगळ्या जॉनरची ६ सुमधुर गाणी आहेत. विशेष म्हणजे, अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेले ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे ख़ास आकर्षण आहे. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे.

नवीन, जुना असा काही फरक मुळात नसतो - छाया कदम 

नवोदित दिग्दर्शक असल्याने तुम्ही प्रोजेक्टला होकार कशाप्रकारे कळवलात असे विचारले असता, छाया कदम यांनी असे सांगितले की, मुळात कथा आणि पहिल्या मिटींगच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी स्पष्ट होत असतात. त्यामुळे नवीन आणि जुने असा प्रश्नच उरत नाही. याउलट नवीन मुलांसोबत काम करताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. 

logo
marathi.freepressjournal.in