"कुलकर्णीनं केलेली 'ती' जखम मात्र दाखवली आहे..." मालवण घटनेवरची किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Viral Post: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरून अभिनेता किरण माने याने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहली आहे.
"कुलकर्णीनं केलेली 'ती' जखम मात्र दाखवली आहे..." मालवण घटनेवरची किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran Mane/Facebook
Published on

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला भव्य पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी कोसळला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाऱ्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे उन्मळून पडावे लागल्याने समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आठ महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात अगदी वाजतगाजत या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. या घटनेवरून आता सोशल मीडियावर सगळेच व्यक्त होत आहेत अशातच आता अभिनेता किरण माने यांनीही फेसबुकवर मोठी पोस्ट लिहली आहे.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

छ. शिवाजी महाराजांच्या संपुर्ण आयुष्यात त्यांच्यावर फक्त एकच वार झाला. जो अफजलखानाचा सहकारी कृष्णा कुलकर्णी यानं केला होता! अर्थात महाराजांकडे असलेल्या चपळतेमुळे तो कुलकर्णी आपल्या महाराजांचा घात करू शकला नाही. कपाळावर पुसटशी जखम झाली. मालवणच्या त्या पुतळ्याचं काम ज्या नवशिक्या, सुमार दर्जाच्या पोरानं केलं, त्याच्यासंदर्भात असा एक स्क्रीनशाॅट व्हायरल होतोय की त्यानं जाणीवपूर्वक, लक्षात ठेवून महाराजांच्या कपाळावरची कुलकर्णीनं केलेली 'ती' जखम मात्र दाखवली आहे! हे खरंखोटं सिद्ध होईलच पण त्या निमित्तानं कृष्णा कुलकर्णी पुन्हा प्रकाशात आला.

थांबा. 'कुलकर्णी' या आडनांवामुळं लगेच सरसकट सगळ्या ब्राह्मणांना एका पंक्तीत बसवू नका भावांनो. कृष्णा कुलकर्णी हा ब्राह्मण्यवादी होता. प्रत्येक ब्राह्मण हा ब्राह्मण्यवादी नसतो. अनेक ब्राह्मण मानवतावादी असतात. तसंच ब्राह्मण्यवाद्यांच्या बहकाव्यात आलेला बहुजनही ब्राह्मण्यवादी असतो. गल्लत नको.

आजपासून हे ब्राह्मण्यवादी कसे ओळखायचे याची नवी आणि हुकमी ट्रीक सांगतो... नीट वाचा.

ज्या बांडगुळांना परवापर्यन्त हिंदु धर्माचा आणि छत्रपतींचा पुळका होता पण पुतळा कोसळल्यापासून मात्र ज्यांनी चिडून उद्घाटन केलेल्या सत्ताधार्‍यांना जाब विचारला नाही... यामागच्या भ्रष्टाचाराची लगेच चौकशी करा अशी मागणी केली नाही... त्या सगळ्या कृष्णा कुलकर्णीच्या अवलादी अर्थात 'ब्राह्मण्यवादी' !

लै कावेबाज आणि फसवी विचारधारा. 'हिंदू हिंदू' करत महाराजांचे नाव घेत मुस्लीम द्वेष पसरवताना जे कायम पेटलेले असतात पण पुतळा पडल्यापासून जे विझल्यासारखे बोलत आहेत ते 'ब्राह्मण्यवादी' ! मग ते कुठल्याही जातीचे असूदेत.

अजून इस्कटून सांगतो. ज्यांनी विशाळगडावरच्या अतिक्रमणापास्नं ते लांब तिकडं बांग्लादेशात झालेल्या हिंदूवरच्या अत्याचारावर पोस्टीवर पोस्टी टाकल्यात.. कमेन्टमध्ये तडतडून भांडलेत पण परवा महाराजांचा पुतळा कोसळल्यावर मात्र सत्ताधार्‍यांचा धिक्कार करणारी ज्यांनी एकही पोस्ट केली नाही... ती कृष्णा कुलकर्ण्याची पिलावळ... म्हणजेच 'ब्राह्मण्यवादी' !

आता तरी ओळखा भावांनो, यांचं महाराजांवर आणि धर्मावर काडीचंही प्रेम नाही... शिवरायांच्या नांवाचा वापर करून बहुजनांना मुसलमानांविरोधात भडकवायचं.. मराठा-ओबीसी आग लावून द्यायची.. आरक्षणावरून दलितांना टोमणे मारायचे... बहुजन- मुस्लिम फूट पाडून आपण स्वत: सुरक्षित राहून या दोघांच्यावर सत्ता गाजवायची हे काम ते अनेक वर्ष करत आलेत.

सावध व्हा. शहाणे व्हा. मानवतेची कास धरा. द्वेष करून आपल्या माणसांचेच वैरी होण्यापेक्षा प्रेम करून माणसं जोडा. माणसांना एकमेकांपास्नं तोडू पहाणारी विषारी पिलावळ ठेचा.

जय शिवराय... जय भीम.

- किरण माने.

घडलेल्या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून, त्यांनी बुधवारी ‘मालवण बंद’ची हाक दिली. या बंदला मालवणकराणी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in