
हैदराबाद : 'पुष्पा-२' चित्रपटाचा प्रमुख अभिनेता अल्लू अर्जुनची शनिवारी सकाळी ६.३० वाजता चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती.
कनिष्ठ न्यायालयाने त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती, मात्र त्यानंतर त्याला तेलंगणा हायकोर्टाने चार आठवड्यांचा अंतरिम जामीन दिला. तथापि, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाला जामिनाची प्रत न मिळाल्याने अल्लू अर्जुनला शुक्रवारची रात्र कारागृहातच काढावी लागली. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानंतर अल्लू अर्जुनला कडक सुरक्षा व्यवस्थेत चंचलगुडा तुरुंगात पाठवण्यात आले.
अखेर शनिवारी सकाळी त्याची मुक्तता झाली. घरी पोहोचताच आईला घट्ट मिठी मारली आणि घरात पाऊल टाकले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत घडलेल्या प्रकाराबाबत तसेच पीडित कुटुंबाप्रति दिलगिरी व्यक्त केली.