भार्गवीची नखरेल राधा ; ‘येतोय तो खातोय’ नाटकात दाखवणार गावरान ठसका

अजित परब, संज्योती जगदाळे, संपदा माने यांचा स्वरसाज नाटकातील गाण्यांना लाभला आहे.
भार्गवीची नखरेल राधा ; ‘येतोय तो खातोय’ नाटकात दाखवणार गावरान ठसका
Published on

उत्तम अभिनय, नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री भार्गवी चिरमुलेची हिनं मनोरंजन विश्वामध्ये स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या कामासंदर्भातील नव नवीन माहिती ती चाहत्यांना देत असते. आता एका वेगळ्या अंदाजात ती आपल्यासमोर येणार आहे. नोटा घ्या.. नोटा द्या. ‘जुन्या द्या’… नव्या घ्या असं ती सगळ्यांना सांगत आहे. हा नेमका प्रकार काय आहे? हे जाणून घेणयासाठी तुम्हाला भार्गवीचं ‘येतोय तो खातोय’ हे नवं लोकनाटय पहावं लागेल.संदेश सुधीर भट सादरकर्ते असलेल्या या नाटकाचे निर्माते मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये आहेत.

यात भार्गवी ‘राधा’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही व्यक्तिरेखा सर्वसामान्यांचे प्रतीक आहे. यात भार्गवीचा पारंपरिक शृंगारिक अंदाज पहायला मिळतोय. ‘येतोय तो खातोय’ या लोकनाटयात अभिनय आणि नृत्य यांचा मिलाफ असल्याने अभिनय आणि नृत्याची आपली आवड एकत्रित दाखवता येत असल्याचा आनंद भार्गवी व्यक्त करते. हे पूर्णपणे वगनाट्य असून आधुनिक पद्धतीने मांडण्यात आलं आहे. गण, गवळण, लावणी, कटाव असे सर्व प्रकार यात पहायला मिळणार आहेत.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी सांगते, आजपर्यंत मी गावरान ठसक्याच्या भूमिका केल्या नव्हत्या ‘येतोय तो खातोय’ नाटकाच्या निमित्ताने अशी वेगळी भूमिका करण्याची संधी मला मिळाली. जी माझ्यासाठी आव्हानात्मक असल्याचे भार्गवी सांगते. या नाटकासाठी भाषेचा लहेजा खूप महत्त्वाचा होता. त्यासाठी मी बरीच मेहनत घेतली असून माझ्या भूमिकेतून गावरान भाषेचा गोडवा रसिकांना अनुभवयाला मिळेल. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर लिखित आणि हृषिकेश जोशी दिग्दर्शित या नाटकात भार्गवी चिरमुले सोबत हृषिकेश जोशी, संतोष पवार, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, मयुरा रानडे, सलीम मुल्ला, ऋषिकेश वांबुरकर, महेंद्र वाळुंज हे कलाकार असणार आहेत.

हे नाटक ऐकल्यानंतर आर के लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ ची आठवण झाल्याचं सांगताना नाटकाचे निर्माते मिलन टोपकर सांगतात की, ‘सामान्य माणूस आजूबाजूच्या घटनांकडे कुतूहल मिश्रीत आणि मिश्कील नजरेने बघतो तेच दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे’. सध्या घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घडामोडीचा हसता हसता परामर्श घेणारं हे नाटकं प्रत्येकजण रिलेट करू शकेल असा विश्वास निर्माते चंद्रशेखर आठल्ये यांनी बोलून दाखविला. निर्माते मोहन दामले म्हणाले की, ऐकताक्षणी या नाटकाची संहिता मला भावली. उत्तम विषय, ताकदीचे कलाकार, गीत-संगीत अशी चांगली भट्टी या नाटकामुळे जुळून आली आहे. या सगळ्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचंही दिलखुलास मनोरंजन करेल.

अजित परब, संज्योती जगदाळे, संपदा माने यांचा स्वरसाज नाटकातील गाण्यांना लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन मयूर वैद्य यांचे आहे. ढोलकीसाठी प्रणय दरेकर तर हार्मोनियमसाठी, दुर्गेश गोसावी यांनी वाद्य वृंदाची साथ दिली आहे

logo
marathi.freepressjournal.in