भारतीय सिनेमाचे भवितव्य नागरिक ठरवतील : जावेद अख्तर यांचे मत ; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

महाराष्ट्रात कलेचा सन्मान केला जातो.
भारतीय सिनेमाचे भवितव्य नागरिक ठरवतील : जावेद अख्तर यांचे मत ; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

सुजित ताजने/छत्रपती संभाजीनगर : आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्या इतके दिग्दर्शक ज्यांनी संवेद- नशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील, यावर भारतीय सिनेमाचे भविष्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले.

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळी वरील कलावंताच्या उपस्थितीत झाले. यावेळी, गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिध्द हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मंचावर एनएफडीसीच्या वरीष्ठ अधिकारी गौरी नायर, फिल्मसिटी मुंबईचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी व सर्व संबंधित उपस्थित होते.

जावेद अख्तर म्हणाले की, ‘‘या भागातील नागरिक कलेचा सन्मान करणारे आहेत. मी २० वर्षाचा असताना मुंबईला आलो. त्यावेळी मी मराठी नाटके पाहिली, अशी कला मी कधीही पाहिली नव्हती. तेंव्हापासून मी महाराष्ट्रात राहत असून दिवसेंदिवस माझे डोळे उघडत गेले. महाराष्ट्रात कलेचा सन्मान केला जातो. विशेषतः साहित्य, कला, कविता, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीताबद्दल या भागातील सामान्य नागरिक विचार करतो, त्याला सन्मानित करतो, ही खूप आशादायी बाब आहे. समकालीन काळात चित्रपट बनवणाऱ्यापेक्षा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून कोणत्या प्रकारचे चित्रपट बनतील आणि कोणत्या प्रकारचे चित्रपट बनणार नाहीत; याची जबाबदारी लोकांवर आहे. त्याचप्रमाणे आजच्या चित्रपटात मूल्य, नैतिकता आणि कोणत्या प्रकारचे संस्कार असतील हे सामान्य नागरिक ठरवतील असेही यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी सांगितले.

अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल प्रसिध्द गीतकार व पटकथाकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना यावर्षीचा 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in