
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. दोघांनी परस्परांविरोधात २०२० मध्ये वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल केले होते. शुक्रवारी दोघांनी न्यायालयात हजेरी लावून वादावर सामोपचाराने तोडगा काढला. त्या आधारे दंडाधिकाऱ्यांनी खटले निकाली काढले.
अख्तर यांचे वकील जय के. भारद्वाज यांनी दोघांमधील वाद मिटल्याची माहिती दिली. दोघांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटवले आहे. जे काही घडले ते गैरसमजामुळे झाले, असे कंगनाने न्यायालयात सांगितले. तिने १९ जुलै २०२० रोजी तसेच त्यानंतर केलेली सर्व विधाने बिनशर्त मागे घेत आहे. भविष्यात अशी कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमी न्यायालयाला दिली. आपल्या विधानांमुळे जावेद अख्तर यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल कंगनाने त्यांची माफी मागितली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आशिष आवारी यांनी पुढाकार घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. कंगना राणावतचे वकील रिजवान सिद्दिकी यांनी दोन्ही कलाकारांमधील वाद मिटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. कंगनाने वादावर तोडगा काढल्यानंतर इंस्टाग्रामवर जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. आज मी आणि जावेद जी यांनी मानहानीचे प्रकरण मध्यस्थीद्वारे मिटवले आहे. जावेद अख्तर यांनी माझ्या दिग्दर्शनासाठी गाणी लिहिण्यासही सहमती दर्शवली आहे, असे कंगनाने स्पष्ट केले.
प्रकरण काय?
कंगना राणावत हिने एका मुलाखतीमध्ये वादग्रस्त विधाने केली आणि बदनामी केली, असा दावा करीत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध २०२० मध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता. अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने इलेक्ट्रॉनिक मीडियाला मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी तिने मानहानीकारक विधाने केल्याचा जावेद अख्तर यांचा दावा होता. या प्रकरणात जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे दोघांतील न्यायालयीन वाद चिघळला होता.