
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित चित्रपट ‘मनाचे श्लोक' आता नव्या नावाने उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू बोल ना’ या नव्या नावानं, नव्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.
‘मनाचे श्लोक' नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. सेन्सॉर बोर्ड आणि न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतरही काही संघटनांच्या वतीने चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या गोंधळानंतर निर्मात्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, थिएटर्स आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी नव्या नावासह, नव्या जोमानं चित्रपट पुन्हा सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
''गेले काही दिवस आमच्यासाठी कठीण काळ होता, परंतु रसिक प्रेक्षक, समाजमाध्यमं आणि हिंदी - मराठी चित्रपटसृष्टीचा अभूतपूर्व पाठिंबा आम्हाला खूप बळ देऊन गेला. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा नव्या नावानं, नव्या ऊर्जेनं चित्रपट प्रदर्शित करत आहोत, असे निर्मात्यांनी सांगितले.
मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब अशी तरुणांची तगडी फळी या चित्रपटात झळकणार आहे. तसेच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर हे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘तू बोल ना’ हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रदर्शित होणार असून, निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत.