
माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ऐतिहासिक चित्रपटाच्या (Har Har Mahadev) सादरीकरणावर टीका केल्यानंतर सोमवारी रात्री राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडला. यादरम्यान एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. यावरून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना या चित्रपटाबाबत न बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत, 'राष्ट्रवादीच्या डोक्यातुन "जात" अजिबात जात नाही!' अशी टीका केली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांची भूमिका काय?
या सर्व प्रकारानंतर हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे हे आपली भूमिका मांडणार आहे. याआधी त्यांनी ट्विट करत म्हंटले की, "ठाणे येथील हर हर महादेवच्या शोमध्ये घुसून सामान्य मराठी प्रेक्षकावर भ्याड हल्ला केल्याबद्दल हर हर महादेवची पूर्ण टीम या विकृत गुंडांचा निषेध करते. माझ्या छत्रपतींवर राजकारण खेळणं बंद करा आणि त्यांचे दैवी विचार आचरणात आणा. खरी शिवभक्ती काय असते हे राजसाहेब ठाकरेंकडून शिका." अशी टीका त्यांनी केली आहे.
नक्की काय घडलं?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काही समर्थकांनी ठाण्यामधील विवीयाना माॅलमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडला. या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप जितेंद्न आव्हाड यांनी केला. सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडियोमध्ये दिसत आहे की, एक प्रेक्षक 'शो बंद पाडताय मग आमचे पैसे परत द्या' अशी मागणी तेथील व्यवस्थापनाकडे करत होता. यावेळी शो बंद पाडण्यास आलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की करत, त्याला मारहाणदेखील केली. त्या प्रेक्षावर ५-६ कार्यकर्त्यांनी हल्ला चढवल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसून येते. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे.