बॉलीवूडमधील प्रथितयश निर्माते आणि दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं वयाच्या ९३ वर्षी निधन झालं आहे. राजकुमार कोहली यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. आज (२४ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे. सकाळी अंघोळीसाठी गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. यावेळी अभिनेता अरमान कोहलीनं त्यांना उपचारासाठी ताबोडतोब रुग्णालयातही दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी कोहली यांना मृत घोषित केलं. असं वृत्त 'न्युज १८' नं प्रसिद्ध केलं आहे.
बॉलीवूडमध्ये त्यांनी १९६६ डेब्यू केला होता. धुला भाटी आणि १९७० मध्ये लुटेरा या चित्रपटांचं दिग्दर्शन करुन त्यांनी प्रेक्षकांना वेगळा आनंद दिला होता. त्यांच्या जाण्यानं प्रेक्षकांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. राजकुमार कोहली यांच्या जानी दुश्मन या चित्रपटानं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर नागिन, पती पत्नी और तवायफ, या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक सेलिब्रेटींनी दिल्या आहेत.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहलीचे वडील असणारे राज कुमार कोहली हे गेल्या पाच दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय होते. त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट निर्मिती करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या. दरम्यान त्यांचं हदयविकारानं निधन झालं आहे.