कलम ३७० हटवल्याने काश्मीर समस्या अधिक गुंतागुंतीची- इम्रान खान

भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आणि बेकायदा निर्णयामुळे अनेक दशकांपासून चाललेला संघर्ष सोडविण्याऐवजी काश्मीर प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल.
कलम ३७० हटवल्याने काश्मीर समस्या अधिक गुंतागुंतीची- इम्रान खान
PM
Published on

इस्लामाबाद : कलम ३७० संबंधात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काश्मीर समस्या अधिक गुंतागुंतीची होईल, असे मत सध्या तुरुंगवासात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व क्रिकेटर इम्रान खान यांनी व्यक्त केले आहे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकमताने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा ऑगस्ट २०१९ चा निर्णय बैध ठरवून त्यावर शिक्कामोर्तब केले. यावर रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंदिस्त असलेल्या खान यांनी एका संदेशात म्हटले की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे पूर्ण उल्लंघन आहे, असे त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यात खान यांनी स्पष्ट केले की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या वादग्रस्त आणि बेकायदा निर्णयामुळे अनेक दशकांपासून चाललेला संघर्ष सोडविण्याऐवजी काश्मीर प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होईल.

त्यांचा पक्ष काश्मिरी जनतेला संपूर्ण राजनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देत राहील, असे त्यांनी वचन दिले. खान यांना त्यांच्या पक्षाने "पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे आजीव  अध्यक्ष" म्हणून संबोधित केले होते.  काश्मीर प्रश्न हा पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वादाचा मुख्य मुद्दा आहे, याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

द्विपक्षीय राजनैतिक संबंध कमी केल्याचा संदर्भ देत २०१९ मध्ये भारताने काश्मीरचा विशेष दर्जा बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पीटीआय सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय हितांना प्राधान्य देत भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. तथापि, ५ ऑगस्ट २०१९ नंतर ते शक्य झाले नाही कारण आम्हाला काश्मिरी लोकांच्या आकांक्षांशी तडजोड करायची नव्हती.

logo
marathi.freepressjournal.in