

बीजिंग : चीनने शुक्रवारी जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) भारताविरुद्ध एक याचिका दाखल केली आहे. भारताकडून माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आयसीटी) उत्पादनांवर शुल्क लावण्यात येत असून सौर क्षेत्रासाठी अनुदान देण्यात येत आहे. यामुळे चीनच्या व्यापारी हितसंबंधांना बाधा येत आहे. त्यामुळे ‘डब्ल्यूटीओ’ने भारतासोबत सल्लामसलत करावी, अशी विनंती चीनने केली आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या या उपायांमुळे ‘डब्ल्यूटीओ’च्या अनेक नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे भारतात देशांतर्गत उद्योगांना स्पर्धात्मक फायदे मिळतात, तर चीनच्या हितांना बाधा पोहोचते. यावर्षी चीनने भारताविरोधात ‘डब्ल्यूटीओ’मध्ये दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे. ऑक्टोबरमध्ये भारताच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीसाठी अन्यायकारक अनुदान देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता.