
महाराष्ट्रातील राज्यसभेचे शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपचे राज्यसभा खासदार पियुष गोयल, विकास महात्मे, विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम यांच्या ६ जागांसह राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५७ जागांसाठीचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला. येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, बिहारमधून ५ आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून ४-४ जागांवर निवडणूक होणार आहे. २४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
येत्या तीन महिन्यांत रिक्त होणाऱ्या जागांसाठीचा देखील निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर करण्यात आला. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, काँग्रेसच्या अंबिका सोनी, जेडीयूचे के.सी. त्यागी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. गुरुवारी राज्यसभेत या सदस्यांच्या निरोपाचा औपचारिक सोहळा पार पडणार होता. मात्र, भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनाचे वृत्त राज्यसभेत येताच राज्यसभेने दिवंगत सदस्याला श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली.
राज्यसभेच्या ५७ जागा या १५ राज्यांमधील आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, बिहार , झारखंड आणि हरयाणा या राज्यांतील जागांचा त्यामध्ये समावेश आहे.
राज्यसभेत एकूण संख्याबळ २३८ आणि राष्ट्रपतीनियुक्त १२ अशा २५० जागा असतात. सध्या राज्यसभेच्या २४५ जागा आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर १९ जागा निवडून दिल्या जातात.
सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेनेचा १ आणि काँग्रेसचा १ खासदार निवडून येऊ शकतो. सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे निवडणुकीत कुणाचा पत्ता कट होणार हे पाहावे लागणार आहे.