निवडणूक गैरव्यवहार चौकशीसाठी समिती स्थापन; रावळपिंडी आयुक्तांच्या आरोपांनंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाची कारवाई

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सर्वाधिक संख्येने निवडून आले.
निवडणूक गैरव्यवहार चौकशीसाठी समिती स्थापन; रावळपिंडी आयुक्तांच्या आरोपांनंतर पाकिस्तान निवडणूक आयोगाची कारवाई

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान निवडणूक आयोगाने उच्चस्तरीय समिती नेमली आहे. रावळपिंडीचे विभागीय आयुक्त लियाकत अली चठ्ठा यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याची जाहीर कबुली देत राजीनामा दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यात इम्रान खान यांच्या पक्षाचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार सर्वाधिक संख्येने निवडून आले. त्यापाठोपाठ जागा नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो यांच्या पक्षांना मिळाल्या. पण सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला १३३ जागांचा आकडा कोणीच पार करू शकले नाही. या निवडणुकीत रावळपिंडीतील १३ उमेदवारांना जबरदस्तीने विजयी घोषित करण्यात आल्याचा दावा विभागीय आयुक्त लियाकत अली चठ्ठा यांनी केला होता.

सरकारी अधिकाऱ्यांनी जवळपास ५० हजार मतांनी पिछाडीस असलेल्या अनेक उमेदवारांना मतपत्रिकांवर खोटे शिक्के मारून विजयी केले, असे त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद भरवून मान्य केले होते. निवडणुकीच्या निकालात फेरफार झाल्याची जबाबदारी स्वीकारून चठ्ठा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य न्यायाधीश देखील या गैरव्यवहारामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने चठ्ठा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर केलेले आरोप ठामपणे फेटाळले आहेत. आयुक्तांच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि आरोपांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली.

logo
marathi.freepressjournal.in