
श्रीलंकेतील परिस्थिती अराजकडेकडे वाटचाल करत आहे. ठिकठिकाणी हिंसाचार पसरला असून मंत्री, राजकीय नेत्यांना सर्वसामान्य जनता लक्ष्य करत आहे. माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी हेलिकॉप्टरमधून पलायन केले असून नौदल तळावर त्यांनी आश्रय घेतला आहे. दरम्यान, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असल्याने संपूर्ण देशाची व्यवस्था लष्कर व पोलिसांना दिली आहे. सोमवारी दिवसभरात झालेल्या हिंसाचारात आठजण ठार झाल्याचे वृत्त आहे.
श्रीलंकेने आपत्कालिन अधिकार लष्कर व पोलिसांना दिले आहेत. त्यात वॉरंटशिवाय नागरिकांना ताब्यात घेण्याचा अधिकार मिळाला आहे. तसेच श्रीलंकेच्या ॲटर्नी जनरलनी पोलीस प्रमुखांना हिंसाचाराच्या तपासाचे आदेश दिले आहेत. काल झालेल्या हिंसाचारात आठजण ठार झाले असून २०० जण जखमी झाले आहेत. श्रीलंकेची आर्थिक अवस्था भयानक झाली आहे. हजारो लोक रस्त्यावर निदर्शने करत आहेत. सरकारी निवासस्थाने जाळली जात आहेत.
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या कुटुंबाने त्रिकोमाली नौदल तळावर शरणागती पत्करली आहे. राजपक्षे यांच्या मुळ गावी संतप्त जमावाने आग लावली. या नौदल तळाबाहेर जनतेने आंदोलन सुरू केले आहे. हिंसाचार व आंदोलन रोखायला हजारो पोलीस तैनात केले आहेत. संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचारात २०० हून अधिक जणजखमी झाले. राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर जनता संतप्त आहे.
माजी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाला आंदोलन कर्त्यांनी घेरले आहे. या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी लष्कराला पाचारण करावे लागले.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकेतील नागरिक अन्न, पाणी, वीज व इंधनाच्या समस्येने हैराण आहेत. लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहेत. जनतेने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
सार्वजनिक मालमत्तेचे जो नुकसान करताना दिसेल, त्यांना तात्काळ गोळ्या घालण्याचे आदेश श्रीलंकेच्या संरक्षण खात्याने दिले आहेत.