लाहोर : कारगिल कारवाईला विरोध केल्याबद्दल (दिवंगत) जनरल परवेझ मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये सरकारमधून त्यांची हकालपट्टी केली होती, कारण त्यांनी भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते, असे उद्गार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शनिवारी बोलताना काढले.
तीनवेळा पंतप्रधान राहिलेल्यांनी त्यांची पंतप्रधानपदावरून मुदतीपूर्वीच हकालपट्टी का केली, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, १९९३ आणि १९९९ मध्ये माझी हकालपट्टी का झाली हे मला सांगितले पाहिजे. जेव्हा मी कारगिल कारवाई होऊ नये असे म्हणत विरोध केला होता तेव्हा मला (जनरल परवेझ मुशर्रफ यांनी) काढून टाकले होते आणि नंतर मी जे बोललो ते खरे ठरलं.
ते म्हणाले की, मला हे जाणून घ्यायचे आहे की प्रत्येक वेळी माझी हकालपट्टी का करण्यात आली, पंतप्रधान असतानाच दोन भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिल्याचेही शरीफ यांनी सांगितले. आम्ही प्रत्येक आघाडीवर काम केले आहे. माझ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात, दोन भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली. मोदी आणि वाजपेयी लाहोरला आले होते. भारत आणि इतर शेजारी देशांसोबतच्या सुधारलेल्या संबंधांवर भर दिला. आम्हाला भारत, अफगाणिस्तान आणि इराणसोबतचे संबंध सुधारावे लागतील. आम्हाला चीनसोबत अधिक मजबूत संबंध बनवण्याची गरज आहे.
आर्थिक वाढीच्या विकासात पाकिस्तान आपल्या शेजारी राष्ट्रांच्या मागे गेल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे तुरुंगात असलेले माजी अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर निशाणा साधत शरीफ म्हणाले की, एका अननुभवी माणसाला देशाची सूत्रे का दिली गेली हे मला माहीत नाही. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेची पडझड झाली. त्यानंतर शहबाज शरीफ सरकारने एप्रिल २०२२ मध्ये सत्ता हाती घेतली आणि देशाला डिफॉल्टपासून वाचवले.