

मुंबई : मोहम्मद अली जिन्ना यांच्या प्राणघातक आजाराचे रहस्य निष्ठेने जपणाऱ्या मुंबईतील दोन पारशी डॉक्टरांना ‘निशान-ए-इम्तियाज’ पुरस्कारासाठी नामांकित केले आहे, अशी माहिती पाकिस्तानचे नियोजन, विकास आणि विशेष उपक्रम मंत्री अहसान इक्बाल यांनी जाहीर केले.
ही कथा चिकित्सक डॉ. जल रतनजी पटेल आणि रेडिओलॉजिस्ट डॉ. जल धाबो-कू यांच्याभोवती फिरते. मे १९४६ मध्ये, भारत स्वातंत्र्याच्या जवळ येत असताना जिन्ना यांनी मुंबईत वैद्यकीय तपासणी आणि फुफ्फुसांचे स्कॅन केले. क्ष-किरण तपासातून त्यांना गंभीर फुफ्फुसाचा क्षयरोग (टीबी) असल्याचे स्पष्ट झाले. तो प्राणघातक आजार मानला जात होता. यामुळे जिन्ना यांच्याकडे केवळ एक ते दोन वर्षांचे आयुष्य उरले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे जिन्ना यांनी त्यांच्या वैद्यकीय पथकाला हे रहस्य पूर्णपणे गुप्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.
जिन्ना हे अंतिम घटका मोजत आहेत हे जर ब्रिटीश प्रशासन किंवा राजकीय प्रतिस्पर्ध्यांना समजले असते, तर त्यांची रणनीती पूर्णपणे बदलली असती. त्याऐवजी, डॉ. पटेल आणि डॉ. धाबो-कू यांनी वैद्यकीय अहवाल मुंबईतील एका तिजोरीत सुरक्षित ठेवले. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील गुप्ततेच्या नियमाचे पालन करून त्यांनी महत्त्वपूर्ण वाटाघाटींदरम्यान जिन्ना यांचे राजकीय वर्चस्व कायम ठेवले.