

वॉशिंग्टन : ५० वर्षांहून अधिक काळानंतर मानवाने चंद्राच्या दिशेने केलेल्या पहिल्या ऐतिहासिक प्रवासाचा शुक्रवारी यशस्वी समारोप झाला. नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेतील चार अंतराळवीर चंद्राची प्रदक्षिणा करून प्रशांत महासागरात सुखरूप उतरले. या यशानंतर आता 'नासा'ने चंद्रावर मानवाला उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ८:०७वाजता (ईस्टर्न टाइम) सॅन दिएगोच्या किनारपट्टीजवळ अंतराळवीरांचे कॅप्सूल समुद्रात उतरले. या ऐतिहासिक क्षणी नासाच्या केंद्रात टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करण्यात आला. या मोहिमेत कमांडर रीड वाईजमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि कॅनडाचे जेरेमी हॅन्सन यांचा समावेश होता. डिसेंबर १९७२ मधील 'अपोलो १७' मोहिमेनंतर चंद्रापर्यंत जाणारी ही पहिलीच मानवी मोहीम ठरली आहे.
उड्डाण संचालक रिक हेन्फ्लिंग यांनी सांगितले की, सर्व अंतराळवीर निरोगी असून त्यांना लवकरच ह्यूस्टनला नेले जाईल. या मोहिमेने नासाच्या 'स्पेस लॉन्च सिस्टम' रॉकेट आणि 'ओरियन' मॉड्यूलची क्षमता सिद्ध केली आहे. नासा आता आर्टेमिस-३ मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाला उतरवण्याचे नियोजन करत आहे. तिथे एक कायमस्वरूपी तळ उभारण्याचा नासाचा मानस आहे, ज्याचा उपयोग भविष्यात मंगळ ग्रहावर जाण्यासाठी 'लाँचपॅड' म्हणून केला जाईल.
नासाचे भारतीय वंशाचे असोसिएट अॅडमिनिस्ट्रेटर अमित क्षत्रिय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चंद्राचा मार्ग आता मोकळा झाला आहे, परंतु भविष्यातील आव्हाने ही मागील कामापेक्षा कितीतरी मोठी आहेत. पाऊण लाख मैलांचा प्रवास करून परतताना केवळ एका अंशापेक्षा कमी कोनातून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणे हे नशिबाचे - काम नाही, तर हजारो लोकांच्या परिश्रमाचे फळ आहे.