

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरातील मृतांची संखअया बुधवारी १,१२७ वर पोहोचली आहे. आजही ढिगारे आणि मुसळधार पावसाशी सामना करत बचावपथके कार्य करत असून, तब्बल ४,९०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी संसदेत या नैसर्गिक आपत्तीचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडला असून, हा मुद्दा जागतिक समुदायासमोर आक्रमकपणे मांडण्याची गरज व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेला हा महापूर हिमालयात झालेल्या बर्फाच्या कड्यांच्या घसरणीमुळे आला आहे. हवामान बदलामुळे पर्वतीय भागातील नागरिकांवरील धोके किती पट वाढले आहेत, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे, असे शाह यांनी नमूद केले. हवामान बदलामागे जागतिक घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे याचे परिणाम कमी करण्याची आणि ते व्यवस्थापित करण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय समुदायाची आहे. ही आपत्ती हवामान बदलाशी जोडलेली आहे, हे सत्य आपण जागतिक व्यासपीठावर ठामपणे मांडले पाहिजे, असे ते म्हणाले.