

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. पूरग्रस्त भागातून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात येत असल्याने या आपत्तीतील मृतांची संख्या वाढून १,३५५ वर पोहोचली आहे. ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटी’नुसार, अजूनही ५८९ परदेशी नागरिकांसह ४,९९६ लोक बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
आतापर्यंत १३,३९६ लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त कमांड शोध आणि बचाव मोहीम राबवत आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधील जलविद्युत प्रकल्पांवर (हायड्रोपावर प्रोजेक्ट्स) मुख्य बचावकार्य केंद्रित करण्यात आले आहे, जेथे शेकडो कामगार बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या मोहिमेत नेपाळी पथकांना मदत करण्यासाठी भारत आणि चीनचे तज्ज्ञ पथकही तैनात करण्यात आले आहे.
२६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ मोठे हिमस्खलन झाल्याने हे विनाशकारी महापूर आले. यामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरे व गावे उद्ध्वस्त झाली आहेत.
हिमालयीन सीमाभागातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले असून जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. चीनमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, या आपत्तीमुळे चीनच्या हद्दीत (तिबेट) किमान २१ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.