

काठमांडू : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण ढगफुटीसदृश पुरातील मृतांचा आकडा मंगळवारी १,०५० वर पोहोचला. देशातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांकडून आणखी मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सुमारे ४ हजार जण अद्याप बेपत्ता असून, त्यात ५८३ परदेशी नागरिक आणि काही सुरक्षा कर्मचारी आहेत.
मुसळधार पावसाच्या अधूनमधून सुरू असलेल्या सरी आणि नव्याने जारी करण्यात आलेल्या पूर इशाऱ्यामुळे बचाव पथकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्व, मध्य आणि पश्चिम नेपाळमधील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आतापर्यंत जवळपास १२ हजार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
एनडीआरआरएमएच्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यात सर्वाधिक ३२१ मृतदेह सापडले आहेत. त्यानंतर पूर्व नवलपरासीमध्ये २१६, पश्चिम नवलपरासीमध्ये १७०, नुवाकोटमध्ये ९५, गोरखामध्ये ६५, धादिंगमध्ये ५७, रसुवामध्ये ४१ आणि तनहूनमध्ये ३८ मृतदेह सापडले आहेत.
महापुरात १९ मोटारवाहतूक पूल तसेच अनेक महामार्ग आणि प्रमुख रस्ते वाहून गेले आहेत. यापैकी एक मार्ग चीनसोबतच्या नेपाळच्या मुख्य भू-व्यापार मार्गाचा भाग असून, रसुवागढी सीमा नाक्यालाही जोडतो.
रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांतील पुरामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे काठमांडूला देशातील इतर भागांशी जोडणाऱ्या पृथ्वी आणि त्रिभुवन महामार्गांवर प्रशासनाने एकेरी वाहतूक व्यवस्था लागू केली आहे.