
पेशावर : पाकिस्तानच्या सैन्याने खैबर पख्तुन्वामधील एका गावावर केलेल्या हवाई हल्ल्यात ३० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी हवाई दलाने सोमवारी या गावातील एका भागावर एलएस-६ बॉम्ब हे बॉम्ब टाकले. यामध्ये महिला आणि मुलांसह किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्वा या प्रांतात तिराह खोऱ्यामधील मात्रे दारा हे गाव आहे. याच गावावर पाकिस्तानच्या हवाई दलाच्या सैन्याने पहाटे बॉम्ब हल्ला केला. हा हवाई हल्ला जेएफ-१७ या लढाऊ विमानांमधून करत एलएस-६ बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये ३० जणांच्या मृत्यूसह अनेकजण जखमी झाले आहेत. मात्र, याबाबत अद्याप पाकिस्तान सरकारकडून या घटनेला दुजोरा देण्यात आलेला नाही. हवाई हल्ल्यामुळे त्या गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अचानक झालेल्या हल्यामुळे गावात गोंधळ उडाला आहे.
टीटीपीला लक्ष्य
काही स्थानिक माध्यमांनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने या भागातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) ठिकाणांना लक्ष्य केले होते. मात्र, या कारवाईत सर्वसामान्य नागरिकांचा बळी केला आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात खैबर पख्तूनख्वामध्ये अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या डोंगराळ प्रांतात लपलेल्या दहशतवाद्यांवर अनेक लष्करी कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच ही एक कारवाई होती. मागील काही दिवसांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून प्रामुख्याने अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रांतांमध्ये या कारवाया दिसून येत आहेत.