लाहोर : भारताकडून होणाऱ्या छोट्याशा चिथावणीलाही पाकिस्तान योग्य उत्तर देईल. अण्वस्त्रयुक्त वातावरणात युद्धाला पाकिस्तानी लष्करप्रमुख सय्यद स्थान नाही, अशी धमकी असीम मुनीर यांनी शनिवारी भारताला दिली.
खैबर पख्तुनख्वा येथील अबोटाबादमधील प्रमुख पाकिस्तान मिलिटरी अकादमी (पीएमए) तर्फे आयोजित लष्करी कॅडेट्सच्या पदवीदान समारंभाला संबोधित करताना मुनीर म्हणाले की, "मी भारताच्या लष्करी नेतृत्वाला सल्ला देतो आणि ठामपणे इशारा देतो की, अण्वस्त्रयुक्त वातावरणात युद्धाला जागा नाही. आम्ही कधीही घाबरणार नाही. कोणत्याही किरकोळ संकोचाशिवाय चिथावणीलाही निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी सर्व धोक्यांना निष्प्रभ करून आणि संख्यात्मकदृष्ट्या श्रेष्ठ शत्रूविरुद्ध विजय मिळवून प्रचंड व्यावसायिकता आणि दूरगामी क्षमता प्रदर्शित केल्या आहेत."
पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी भारत दहशतवादाचा वापर शस्त्र म्हणून करत असल्याचा आरोपही मुनीर यांनी केला. ते म्हणाले की, "मूठभर दहशतवादी पाकिस्तानला हानी पोहोचवू शकत नाहीत आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) संदर्भ देत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करणाऱ्या सर्व प्रॉक्सींना नष्ट केले जाईल."
अमेरिका आणि चीनसह प्रमुख शक्तींशी पाकिस्तानचे मजबूत संबंध आहेत, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी शेजारील राष्ट्रांना दिला. या समारंभात मलेशिया, नेपाळ, पॅलेस्टाईन, कतार, श्रीलंका, बांगलादेश, येमेन, माली, मालदीव आणि नायजेरियासह अनेक मैत्रीपूर्ण देशांतील कॅडेट्सनाही पदवी प्रदान करण्यात आली.