
इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली आहे. गेल्या तीस वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे, अशी कबुली त्यांनी एका ब्रिटिश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
गेली ३० वर्षे दहशतवाद पोसण्याचे काम आम्ही अमेरिका, इंग्लंडच्या सांगण्यावरून करत असल्याचे खापर त्यांनी फोडले. दहशतवाद पोसणे ही मोठी चूक होती, त्याचे परिणाम आज आम्हालाही भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले. पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांना पाठिंबा देतो, असा खुलेआम आरोप भारत जागतिक व्यासपीठावरून सातत्याने करत असतो. आता त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, अत्यंत चलाखीने याचे खापर त्यांनी अमेरिका, ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांवर फोडले आहे. अमेरिका, पाश्चिमात्य देशांसाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना समर्थन दिले. या कारनाम्यासाठी आम्हाला दोषी ठरवले जाऊ नये. कारण पाकिस्तान दुसऱ्या देशांच्या निर्देशानुसार काम करत होता.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. ही दहशतवादी संघटना हाफीज सईदच्या ‘लष्कर-ए-तोयबा’शी संबंधित आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर राजनैतिक अधिकाऱ्यांची कपात केली आहे. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. या नागरिकांना आपल्या देशात जाण्यास सांगितले आहे. तसेच सिंधु नदी करारही स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तान संतापला आहे.