

ढाका : बांगलादेशमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (BNP) बहुमतासह विजय मिळवल्याचा दावा केला असून पक्षाचे प्रमुख तारीक रहमान हे पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अंतिम निकाल अद्याप घोषीत झालेले नाहीत. पण, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा बीएनपीने २९९ पैकी बहुमतासाठी आवश्यक १५० जागांचा आकडा ओलांडला होता. तर, जमात-ए-इस्लामीच्या नेतृत्वाखालील आघाडी केवळ ७० जागांवर पुढे होती. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रहमान आणि BNP यांचे "निर्णायक विजयाबद्दल" अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “बांगलादेशच्या संसदीय निवडणुकांमध्ये BNP ला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल तारीक रहमान यांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा विजय तुमच्या नेतृत्वावर बांगलादेशच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे."
‘भारत पुरोगामी बांगलादेशच्या पाठीशी’
पंतप्रधानांनी आश्वासन दिले की भारत लोकशाहीवादी, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक बांगलादेशच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभा राहील. "आपल्या बहुआयामी संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी आणि उभय देशांमधील सामायिक विकासाच्या उद्दिष्टांना गती देण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे," असे त्यांनी नमूद केले.
शेख हसीनांची सत्ता गेल्यानंतर तणाव वाढला
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताकाळात दिल्ली आणि ढाका यांच्यात स्थिर संबंध होते. हसीना यांच्या सरकारने व्यापार, वाहतूक, सीमासुरक्षा आणि जलवाटप करारांवर भर दिला होता. मात्र त्यांच्या सत्तेच्या पतनानंतर आणि अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली भारत-बांगलादेश संबंधांमध्ये काही तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. सीमाभागातील सुरक्षेच्या प्रश्नांबरोबरच बेकायदेशीर स्थलांतर आणि हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील भावना वाढल्याचीही नोंद झाली होती.
भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा?
दुसरीकडे, २००१ ते २००६ या BNP च्या सत्ताकाळात सीमापार दहशतवाद आणि २००४ मधील चटगाव शस्त्रसाठा प्रकरणासारख्या घटनांमुळे भारतात चिंता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, तारीक रहमान यांनी भारताशी संबंध नव्याने सुरू करण्याची (रिसेट) भूमिका घेतली असून दहशतवादविरोधी सहकार्य सुरू ठेवण्याचे, तीस्ता नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न सोडवण्याचे आणि हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही, BNP प्रमुखांच्या “बांगलादेश फर्स्ट” या धोरणामुळे हसीना युगातील संपूर्ण धोरणात्मक सहकार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.