

बिश्केक : धोरण म्हणून परकीय देशांविरुद्ध दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांचा शांघाय सहकार्य संघटनेने (एससीओ) सामना केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. तसेच दहशतवाद्यांचे वित्तपुरवठा आणि भरतीविरुद्धच्या सामूहिक लढ्यात ‘दुटप्पी निकष’ फेटाळून लावण्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य म्हणजे पाकिस्तानावर थेट निशाणा साधल्याचे दिसत आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर अनेक जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत मोदी म्हणाले की, दहशतवादी कारवाया मानवतेसाठी गंभीर आव्हान ठरत आहेत.
दहशतवादाचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करणाऱ्या राज्यांना असा इशारा दिला पाहिजे की, दहशतवाद कधीही कोणासाठीही ‘स्ट्रॅटेजिक ॲसेट’ असू शकत नाही, असे नमूद करून ते म्हणाले की, भारताने सर्व तणाव आणि संघर्ष युद्धाच्या मैदानावर नव्हे, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याचे सातत्याने आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी दहशतवादी परिसंस्थेचे संपूर्ण उच्चाटन करण्याची गरज व्यक्त केली. यामध्ये दहशतवादी संघटनांना होणारा आर्थिक पुरवठा, भरतीची साखळी, आणि दहशतवाद्यांना मिळणारे सुरक्षित आश्रय यांचा समावेश आहे. दहशतवादाला धोरणाचे साधन म्हणून वापरणाऱ्या देशांना स्पष्ट संदेश देण्याची गरज असून, दहशतवाद कोणासाठीही ‘धोरणात्मक साधन’ ठरू शकत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
अफगाणिस्तानातील शांततेवर भर
शांततापूर्ण युरेशियासाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असल्याचे मोदी यांनी नमूद केले. अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्य यांच्याशी युरेशियाच्या शांततेचा जवळचा संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. “अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्याशी शांततापूर्ण व सुरक्षित युरेशियाची आमची सामायिक आकांक्षा जवळून जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानातील जनतेच्या विकासासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आहे आणि यापुढेही ते सुरू ठेवेल,” असे मोदी म्हणाले.
प्रकल्पांनी सार्वभौमत्वाचा आदर करावा
पंतप्रधानांनी संपर्क आणि कनेक्टिव्हिटीच्या प्रकल्पांचे महत्त्वही अधोरेखित केले. बाजारपेठांना जोडणाऱ्या, व्यापाराला चालना देणाऱ्या आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.