काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात लाँग मार्चला संबोधित केले. मात्र, यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. इमरान खान यांनी त्यांच्या पीटीआय पक्षाचे सर्व विधानसभांचे सदस्य राजीनामे देतील, अशी घोषणा केली आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. सध्या इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबमध्ये सरकार आहे.
इम्रान खान हे रावळपिंडी येथे लाँग मार्चमध्ये बोलताना म्हणाले की, " आम्ही सर्व विधानसभांमधून बाहेर पडणार आहोत, आम्हाला भ्रष्ट व्यवस्थेत राहायचं नाही आम्ही बाहेर पडत आहोत. तसेच, हा लाँग मार्चदेखील स्थगित करत आहोत. पीटीआयच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आणि संसदीय पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार आहे. त्या बैठकीत विधानसभेतून बाहेर कधी पडायचं हे जाहीर करु." तसेच, पाकिस्तानी सैन्याचे नवे प्रमुख म्हणून जनरल असीम मुनीर यांची निवड केल्यामुळे घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. इमरान खान यांनी असा दावा केला की, वजीराबादमध्ये तीन शुटर आले होते. त्यांनी माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. मी मृत्यू जवळून पाहिला आहे, अल्लाहने मला वाचवले. लाहोरमधून बाहेर पडताना जीवाला धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता.