चक्क वाळवंटात बर्फवृष्टी! सौदी अरेबियात ३० वर्षांत पहिल्यांदाच Snowfall; काय आहे कारण?

अत्यंत उष्णता आणि विस्तीर्ण वाळवंटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात अलीकडेच एक दुर्मीळ हवामान बदल पाहायला मिळाला. देशाच्या विविध भागांत अचानक थंडीची लाट पसरली आणि बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि गोठवणारे तापमान यामुळे नागरिकही अचंबित झाले.
चक्क वाळवंटात बर्फवृष्टी! सौदी अरेबियात ३० वर्षांत पहिल्यांदाच Snowfall; काय आहे कारण?
चक्क वाळवंटात बर्फवृष्टी! सौदी अरेबियात ३० वर्षांत पहिल्यांदाच Snowfall; काय आहे कारण? Photo : X (@deby2628)
Published on

अत्यंत उष्णता आणि विस्तीर्ण वाळवंटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सौदी अरेबियात अलीकडेच एक दुर्मीळ हवामान बदल पाहायला मिळाला. देशाच्या विविध भागांत अचानक थंडीची लाट पसरली आणि बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि गोठवणारे तापमान यामुळे नागरिकही अचंबित झाले. या असामान्य परिस्थितीमुळे प्रशासनाने अनेक भागांत सतर्कतेचा इशारे दिले.

सौदी अरेबियाच्या उत्तर भागातील ताबुक प्रांतात हिमवृष्टी झाली असून परिसराचं दृश्य अक्षरशः बदलून गेलं आहे. सुमारे २,६०० मीटर उंचीचे 'जेबेल अल-लॉझ' पर्वत शिखर पांढऱ्या बर्फाने झाकलं गेलं. याच भागातील ट्रोजेना या डोंगराळ पर्यटनस्थळावरही बर्फवृष्टीसह हलका पाऊस पडला, ज्यामुळे हा परिसर एखाद्या युरोपियन हिल स्टेशनसारखा भासू लागला.

हिमवृष्टीसोबतच अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

याशिवाय, हेल प्रांतात आणि हेल शहराच्या आसपासही हिमवृष्टीची नोंद झाली आहे, जी सौदीसाठी अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. पहाटेच्या वेळी अनेक ठिकाणी तापमान शून्य अंशांच्या खाली गेलं, त्यामुळे उंच भागांवर आणि मोकळ्या मैदानात बर्फ साचला. हिमवृष्टीसोबतच अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडला. रियाध, कासिम आणि पूर्व प्रांतातील काही भागांतही मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. तर, राजधानीच्या उत्तरेस असलेल्या अल-मजमाह आणि अल-घाट यांसारख्या उंच भागांतही ठिकठिकाणी बर्फ साचल्याचं आढळलं.

हवामान विभागाने सांगितलं कारण

हवामान विभागाच्या माहितीनुसार, थंड हवेचे प्रवाह आणि पावसाचे ढग एकत्र आल्यामुळे ही वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस विशेषतः उत्तर आणि मध्य सौदीत थंडी कायम राहण्याची शक्यता असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी आणि पूर येण्याची शक्यता असलेल्या दऱ्या-खोऱ्यांच्या भागात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. मात्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा घटना विशिष्ट हवामान परिस्थितींमुळे घडत असल्या तरी, त्या वारंवार घडू लागणे हे हवामान बदलासंदर्भातील मोठ्या चिंतेकडे लक्ष वेधते.

logo
marathi.freepressjournal.in