

नवी दिल्ली : बांगलादेशच्या परागंदा झालेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना डिसेंबरमध्ये मायदेशात परतण्याची शक्यता आहे. अटकेचा किंवा मृत्यूचा धोका असूनही, अवामी लीगच्या इतर निर्वासित नेत्यांसह स्वेच्छेने परतण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. 'रॉयटर्स'ला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतर आणि त्यानंतर सरकार कोसळल्यामुळे ७८ वर्षीय हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात आल्या होत्या. बांगलादेशात परतल्यावर आपण न्यायालयात आत्मसमर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातच परिणामांना सामोरे जाणार
आपल्या नियोजित परतीबाबत ढाका येथील सध्याच्या सत्ताधाऱ्यांशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. परतल्यावर ते मला अटक करू शकतात किंवा माझी हत्याही करू शकतात, तरीही मला जावेच लागेल, असेही त्या म्हणाल्या.