

सिडनी : म्यानमारमधील छळवणुकीचा सामना करणाऱ्या अल्पसंख्यांक रोहिंग्या समुदायाच्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या भीषण दुर्घटनेत ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्वासित उच्चायुक्त यांनी गुरुवारी एका संयुक्त निवेदनात ही माहिती दिली.
प्राथमिक माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिमेकडील राखीन राज्यातून या दोन्ही बोटी निघाल्या होत्या. यामध्ये बहुतांश रोहिंग्या प्रवासी होते, ज्यांच्यापैकी काहींनी शेजारील बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधून गुप्तपणे हा प्रवास सुरू केला होता.
सुमारे २५० प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच संपर्क तुटला. तर २८० प्रवासी असलेली दुसरी बोट ८ जुलै रोजी म्यानमारच्या 'अय्यारवाडी' किनारपट्टीजवळ बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दोन्ही दुर्घटना आणि त्यातील मृतांच्या आकड्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.