

मानवाला विविध आजारांसाठी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ही अंतर्गतच विकसित झालेली असते. मात्र, वेगवेगळ्या कारणांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी आजारांशी लढा देण्याची शक्ती कमी होते आणि आपण वारंवार आजारी पडतो. कोविडच्या काळापासून लोक मुख्यत्वे करून रोगप्रतिकारकशक्ती बाबत जागरूक होत आहेत. चला जाणून घेऊया आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमकुवात होण्याची कारणे आणि काय आहेत उपाय...
आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होण्याची चार मुख्य कारणे
चुकीचा आहार
आयुर्वेदानुसार रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याच्या चार मुख्य कारणांपैकी चुकीचा आहार हे एक कारण आहे. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण सातत्याने जंक फूड, फास्ट फूड खातो. परिणामी जास्त तळलेले चमचमीत पदार्थ, थंड तसेच शिळे अन्न वारंवार पोटात गेल्याने शरीरात विषारी द्रव्य तयार होतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
अग्नि कमकुवत होणे
आयुर्वेदानुसार शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि अन्नाचे व्यवस्थित पाचन होण्यासाठी अग्नि हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आपल्या शरीरात अन्नखाल्ल्यानंतर जठराग्नि पेटतो. हा जठराग्नि अन्नाचे पाचन करतो. मात्र, हा जठराग्नि खराब झाल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस होणे असे प्रकार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
त्रिदोषाचे असंतुलन
आयुर्वेदानुसार शरीरात वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष मानले गेले आहे. शरीरात या तिघांचे प्रमाण योग्य असायला हवे. या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
मानसिक ताण
आयुर्वेदानुसार मानसिक ताण हा देखील शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यासाठी कारणीभूत आहे. चिंता, राग, भीती, नैराश्य यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते.
काय आहेत उपाय?
योग्य आहार घेणे
रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी योग्य तो आहार घेणे महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त भाज्या, फळभाज्यांचा आहार घेणे महत्त्वाचे आहे. सोबतच ताजे अन्न खाण्याला आयुर्वेद महत्त्व देते. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणे टाळावे.
योग आणि व्यायाम
योग आणि व्यायाम केल्यामुळे मानसिक आजार जसे की, चिंता, भीती, राग यांसारख्या तक्रारी दूर होतात. परिणामी मन स्थिर राहते. त्यामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)