
नवी दिल्ली : प्रवासी भाडे नाकारणे, अव्वाच्या सव्वा पैसे मागणे, प्रवाशांशी उर्मट बोलणे या रिक्षाचालकांच्या सवयीला तुम्ही कंटाळले असाल तर तुमच्यासाठी खास ऑटोरिक्षा बाजारात दाखल झाली आहे. ‘स्वयंगती’ ही रिक्षाचालकविरहीत असून ती विजेवर चालणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीपणाला आता आळा बसू शकतो.
ओमेगा सीकी मोबिलिटीने जगातील पहिली इलेक्ट्रिक तीनचाकी ऑटो बाजारात आणली. हे वाहन व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध झाले.
‘स्वयंगती’ हे इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म आणि एआय-आधारित ऑटोनॉमी सिस्टीमवर विकसित केले आहे. हे वाहन विमानतळ, व्यापारी संकुल, औद्योगिक वसाहती, गजबजलेल्या शहरी भागात आरामात धावू शकणार आहे. वाहनाला आधीपासून मॅपिंग करून सेट केलं जातं, ज्यामुळे ते ठरलेल्या रस्त्यावर सुरक्षित आणि सुरळीत प्रवास घडवू शकते.
मॅकेन्सीच्या २०२५ रिपोर्टनुसार, जागतिक चालकविरहीत वाहनांचा बाजार २०२३ पर्यंत ६२० अब्ज डॉलरपेक्षा अधिक होणार आहे. भारतासारख्या देशात, जिथे वाहतूककोंडी आणि शेवटच्या घटकापर्यंत दळणवळण ही सर्वात मोठी समस्या आहे, तिथे ही तंत्रज्ञान सुरक्षित आणि किफायतशीर उपाय ठरू शकते.
ओएसएमचे संस्थापक आणि अध्यक्ष उदय नारंग म्हणाले की, ‘स्वयंगती’ एक उत्पादन नसून भारताच्या वाहतुकीच्या भविष्याचा मार्ग ठरवणारे पाऊल आहे. आता चालकविरहीत वाहने हे स्वप्न नाही, तर आजची गरज आहे. यावरून सिद्ध होतं की एआय आणि ‘लिडार’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर भारतात स्वदेशी पातळीवर आणि परवडणाऱ्या किमतीत होऊ शकतो.
कंपनीचे मुख्य धोरणात्मक अधिकारी विवेक धवन म्हणाले की, आमचे उद्दिष्ट वाहन सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आहे. ‘स्वयंगती’ने दाखवून दिले की, विजेरी उद्योगात इंटेलिजेंट सिस्टीम्स आता रोजच्या मोबिलिटीमध्ये आणता येऊ शकतात.
-‘स्वयंगती’ने नुकताच ३ किमी लांबीचा ऑटोनॉमस रूट टेस्ट पूर्ण केला.
-ज्यात ७ स्टॉप्स, रिअल-टाइम अडथळे ओळखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा समावेश होता.
-हे सर्व विनाचालक पूर्ण केले. आता कंपनी त्याच्या दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक उत्पादनाची तयारी करत आहे.