PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

PM Modi Files Nomination Papers: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील काशी येथील कोतवाल कालभैरवाचे दर्शन घेऊन, त्यांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज भरला.
Prime Minister Modi offers prayers at Kaal Bhairav temple ahead of filing nomination from Varanasi
ANI

The Significance of Kaal Bhairav: वाराणसीमध्ये कालभैरवाला समर्पित एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे शहरातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर म्हणजे काशीचे कोतवाल कालभैरव मंदिर. या मंदिरात दर्शन घेऊन, त्यांची परवानगी घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरला (Lok Sabha Election 2024) आहे. पंतप्रधान सकाळी अस्सी घाटातून निघाले आणि कालभैरव मंदिरात पोहोचले. त्यांनी काशीच्या कोतवालांची भेट घेऊन, पूजा करून त्यांची परवानगी घेतली. बाबा काल भैरवाचे पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. पीएम मोदींनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कालभैरवची परवानगी का घेतली हे जाणून घेऊयात...

काय आहे महत्त्व?

पंतप्रधान जेव्हा काही शुभ कार्यासाठी काशीला येतात तेव्हा ते भैरवाचे आशीर्वादही घेतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा बनारसला येतात तेव्हा ते प्रथम भैरवाचे आशीर्वाद घेतात. यानंतर ते भगवान विश्वनाथ यांचे दर्शन घेतात. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या आणि विजयानंतरची जबाबदारी स्वीकारण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम कालभैरवाकडून परवानगी घेतली. बनारसमध्येही प्रत्येक नियुक्तीच्या वेळी, प्रत्येक अधिकारी, मग तो पोलीस विभागाचा असो किंवा इतर कोणत्याही प्रशासकीय विभागाचा, पदभार स्वीकारण्यापूर्वी, बाबा कालभैरवाचे दर्शन घेतो, बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतो आणि संकटमोचनात दर्शन घेतो. यावरून भैरव मंदिराचे दर्शन किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.

वाराणसीतील काळभैरव मंदिर हे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले पवित्र स्थान आहे. 'काशीचे कोतवाल काल भैरव' हे काशी शहराचे संरक्षक मानले जाते. हिंदू पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की ते भगवान शिवाच्या क्रोधाचा अवतार आहे. काशीचे संरक्षक म्हणून, कालभैरव शहराचे वाईट शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते. वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य आणि समृद्धी मिळावी यासाठी भक्त कालभैरवाची प्रार्थना करतात.

वाराणसीच्या पोलिस स्टेशनमध्ये पोलिस स्टेशनचे अधिकारी त्यांच्या मुख्य खुर्चीवर बसत नाहीत. तिथे मुख्य खुर्चीवर फक्त भैरवनाथ बसतात. पूर्ण भक्तिभावाने त्यांचे फोटो खुर्चीवर ठेवलेले आहे. विशेष प्रसंगी, पुजारी भैरवनाथाला पोलिस गणवेश घालतात.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. )

logo
marathi.freepressjournal.in