

भुवनेश्वर : गोव्याच्या साध्वी सतीश साईलने 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२६'चे विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. आता साध्वी ७५ व्या 'मिस वर्ल्ड' (जागतिक सुंदरी) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. शनिवारी रात्री भुवनेश्वर येथे एका दिमाखदार सोहळ्यात देशातील ३० स्पर्धकांमधून तिची निवड करण्यात आली.
आपल्या विजयानंतर आनंद व्यक्त करताना साध्वी म्हणाली की, हा विजय माझ्यासाठी स्वप्नवत आहे. संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी स्पर्धकांचे कौतुक करताना म्हटले की, "फेमिना मिस इंडिया हे एक असे व्यासपीठ आहे जे मुलींना जागतिक स्तरावर ओळख आणि उत्तम ग्रूमिंग मिळवून देते. आपल्या मुलींनी जगभरात यश मिळवून स्वतःला सिद्ध केले आहे.
ओदिशात प्रथमच आयोजन
विशेष म्हणजे, फेमिना मिस इंडियाची अंतिम फेरी ओदिशात आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ होती. या स्पर्धेदरम्यान ३० स्पर्धकांनी कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि चंद्रभागा समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन तेथील संस्कृतीचा अनुभव घेतला.
विजेत्यांची नावे
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या राजनंदिनी पवारने 'फेमिना मिस इंडिया २०२६' (प्रथम उपविजेती) हा किताब पटकावला, तर जम्मू-काश्मीरची श्री अद्वैता जी. हिला द्वितीय उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले.