मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत एसटी बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत एसटी बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला सोमवार १८ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची (MH40 N9848) होती. बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात असून दुपारी ३ पर्यंत यापैकी ८ जणांची ओळख पटल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसंच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेत. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तात्काळ मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचावकार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देऊ केले आहे. यानंतर अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेशमधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले. बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे.

“आम्ही दुर्घटनेची सविस्तर माहिती घेत आहोत. महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. १३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे” अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in