गुजरातमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू ३९ जनावरेही मृत

गुजरातमधील २२९ तालुक्यांना रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
गुजरातमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू ३९ जनावरेही मृत

अहमदाबाद : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ जनावरेही मृतावस्थेत आढळून आली आहेत. दाहोदमध्ये ३ तर भरूचमध्ये दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद, साबरकांठा, खेडा, पंचमहल, बोटाड, मेहसाणा, सुरेंद्रनगर आणि अमरोली येथे वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. अमरोली येथे १६ वर्षीय किशोर याच्यावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. भरूचमध्ये भूरीबेन (५५) आणि त्यांचा मुलगा आकाश कुमार राठोड (१४) हे मासे पकडण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला.

आतापर्यंत ३९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून त्यात खेडा येथे सर्वाधिक १५ जनावरांचा समावेश आहे. गुजरातमधील २२९ तालुक्यांना रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यापैकी ६५ तालुक्यांमध्ये १ ते ४.५ इंच इतका पाऊस झाला. सुरेंद्रनगरमध्ये ४ इंच, सूरत शहरात ३.५ इंच इतका पाऊस पडला.

logo
marathi.freepressjournal.in