महाराष्ट्रात आगामी काळात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. येत्या आठवड्यात १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरात काढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारतर्फे १० लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. याची सुरुवात म्हणून शनिवारी ७५ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले. राज्यातही ७५ हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागांना पत्रं दिली आहेत. सर्व विभागांच्या जाहिराती काढून तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत नामनिर्देशनाद्धारे परीक्षा घेण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.