
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. महामार्गावरील उर्से गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचेही समोर आले आहे. यामध्ये कारमध्ये बसलेल्या तिघांचा मृत्यू झाला असून या तिघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार (एमएच 04 जेएम 5348) मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. उर्से गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या बोनेटसह पुढील भागाचा चक्काचूर झाला. कारची अवस्था इतकी वाईट होती की, मृतदेह आत काढण्यासाठी कारचा पत्रा कटरने कापावा लागला.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. शिरगाव पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली असून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.