
महाराष्ट्रात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्याच्या काळात राज्यातून ३५०० मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवरून समोर आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालत याबातच अहवाल तसंच उपाययोजना आयोगासमोर सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. अयोग कार्यालयात याबाबतची सुनावणी पार पडल्यावर अहवाल सादर केला असला तरी यंत्रणा सक्षम नसल्याचं माझं मत आहे, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली आहे.
या बाबत बोलताना चाकणकर पुढे म्हणाल्या की, " याबाबतची माहिती भारतीय दूतावासाला पाठवली आहे. बेपत्ता मुलींना शोधण्याचे प्रयत्न सुरु असून त्यांना नोकरीच्या आमिषाने नेलं जातं, नंतर त्यांचे मोबाईल आणि कागदपत्रे काढले जातात. राज्यातून दुबई आणि ओमानमध्ये महिलांची तस्करी होत आहे." असा दावा देखील त्यांनी केला आहे.
याबाबत पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "जिल्याच्या ठिकाणी महिलांसाठी एक समिती कार्यरत असावी. फक्त कागदावर काम न करता प्रत्यक्षात यंत्रणा कार्यरत असावी. मात्र, शासनाकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बेपत्ता महिलांसाठी महिला व बालविकास मंत्रालयाकडून एक समिती स्थापन करण्यात आली मात्र, त्यात एकही पोलीस नव्हता. अशात महिलांचा शोध कोण लावणार ?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच कोणावरही टीका करून हा प्रश्न सुटणार नाही. ही बाब गंभीर असून गुहमंत्र्यांनी यावर तातडीने काम करायला हवं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ८२ कुटुंबातील महीला बेपत्ता आहेत. मुलींचं काऊन्सिलींग होणं गरजेचं आहे. तसेच पालकांनी देखील मुला-मुकलींशी संवाद साधत राहणं गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. टीव्ही ९ या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहित दिली आहे.